नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त

मुंबई - नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात आज सकाळी ७ वाजता ९ महिला व एक पुरुष मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील ७ मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे.
अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्रध्दांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील गुंज येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या.
त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे.दोन महिला व एका पुरुषास सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे.
घटना स्थळी वसमत विधानसभेचे आमदार राजु भैय्या नवघरे,तहसीलदार श्रीमती शारदा दळवी यांच्या सह प्रशासनातील अधिकारी व पोलीस प्रशासनाची उपस्थिती होती